'नवनिर्वाचित आमदारांना वेतन अथवा सुविधा देऊ नका'
मुंबई : विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर कोणत्या पक्षाला दिलेल्या वेळात सत्तास्थापनेचा दावा करता आला नाही. त्यामुळे महाराष्ट्रात सध्या राष्ट्रपती राजवट सुरु झाली आहे. युती आणि आघाडी यांची ठरलेली गणितं निवडणुकीनंतर बदलली आहे. महाराष्ट्रात सध्या राजकीय अस्थिरता आहे. दुसरीकडे परतीच्या पावसाने शेतकऱ्यांच्या पिकांचे नुकसान झाले आहे. शेतकऱ्यांना संपूर्ण नुकसान भरपाई आणि कर्जमाफी हे महत्त्वाचे मुद्दे सध्या राज्यासमोर आहे. असे अनेक प्रश्न प्रलंबित असल्याने जनता प्रचंड नाराज आहे. या सर्व घडामोडींच्या पार्श्वभुमीवर आमदारांना वेतन देऊ नये अशी मागणी करण्यात आली आहे.
महाराष्ट्रातील नव्याने निवडून आलेल्या विधानसभा सदस्य अर्थात आमदारांना कोणत्याही प्रकारचे वेतन अथवा सुविधा देऊ नये अशी मागणी माहिती सेवा समितीचे जिल्हाध्यक्ष लक्ष्मण गव्हाणे यांनी राज्यपालांना पत्र पाठवून केली आहे.
महाराष्ट्रातील विधानसभेच्या निवडणुका झाल्यानंतर सत्ता स्थापनेकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. सध्या महाराष्ट्रात अतिवृष्टीमुळे भीषण दुष्काळ पसरलेला असताना शेतकऱ्यांच्या प्रश्नावर तोडगा काढण्यासाठी सरकार स्थापन होणे गरजेचे होते. परंतु अनेक दिवसांपासून सुरु असलेला सत्ता स्थापनेचा तिढा काही केल्या सुटला नसल्यामुळे नुकतीच महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागू करण्यात आली आहे.
'नवनिर्वाचित आमदारांना वेतन अथवा सुविधा देऊ नका'
